
नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारने (Central Government) खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या (Rice) किमान हमीभावामध्ये (MSP) १४३ रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये २१० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मुग डाळीचे कमाल समर्थन मूल्य १० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली आहे...
यावेळी माध्यमांशी बोलतांना मंत्री गोयल यांनी सांगितले की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून (CACP- Commission for Agricultural Costs and Prices) वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला असून त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना ( Farmers) होणार आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावा आणि जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हे निर्णय घेतल्याचे गोयल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२३-२४ च्या हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. ज्यामध्ये तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांनी वाढ करून ७००० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. तर उडदाच्या डाळीच्या एमएसपीमध्येही ३५० रुपयांनी वाढ करून ६९५० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
तसेच मुगाचा एमएसपी ७७५५ रुपयांवरून १०.४ टक्क्यांनी वाढवून ८५५८ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तर भात (सामान्य) सारख्या इतर खरीप पिकांचा एमएसपी २०४० रुपयांवरून २१८३ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. याशिवाय मक्याचा एमएसपी १९६२ रुपये प्रति क्विंटलवरून २०९० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. तर कापसाच्या आणि भुईमुगाच्या एमएसपीमध्ये ९ टक्के वाढ करण्यात आली आहे.