
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Sansad Monsoon Session) सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभेत मंगळवारी घडलेल्या एका घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष बिर्ला संसद भवनात असूनही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले नाहीत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांवर नाराजी व्यक्त करत लोकसभा अध्यक्षांनीही हा निर्णय जाहीर केला.
जो पर्यंत सभागृहाच्या शिस्तिचे पालन होत नाही तो पर्यंत आपण सभापतीच्या आसनावर बसणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले. सभापती बिर्ला म्हणाले की, त्यांच्यासाठी सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सदनाची मर्यादा राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. ते म्हणाले की, सभागृहातील काही सदस्यांची वागणूक सभागृहाच्या परंपरेच्या विरोधात आहे.
मंगळवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी ज्याप्रकारे सभागृहाच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली, गोंधळ तर घातलाच, पण अध्यक्षांच्या दिशेने पत्र ही फेकली. या सर्व प्रकारावरुन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले होते. मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडले.
विधेयक मांडताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याने लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. दिल्ली सेवा विधेयकाला आम आदमी पक्ष विरोध करत आहे. यासोबतच काँग्रेससह भारताच्या विरोधी आघाडीच्या सदस्य पक्षांनीही याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.