
उत्तराखंड | Uttarakhand
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) क्षणात बदलणाऱ्या हवामानाचे रौद्र रुप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ज्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केदारनाथ (Kedarnath) यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या रुद्रपयाग(Rudraprayag) येथील गौरीकुंड (Gaurikund) येथील डाक पुलिया (Dakpulia)भागात जोरदार पावसामुळे दरड कोसळली (Landslide) असून, या भागामध्ये आतापर्यंत १३ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांमध्ये स्थानिक तीन जण, सात जण नेपाळचे तर बाकी अन्य ठिकाणचे लोक असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर सध्या रेस्क्यु टीम दाखल झाली असून ढिगारा हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. गुरवार रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शोधकार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे.
गौरीकुंड येथे रात्री उशीरा दगड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच एसडीआरएफसह जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाले मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याने काम थांबवावे लागले. रुद्रपयागच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार, बेपत्ता नागरिकांचा अद्यापही शोध सुरु आहे.
मंदाकिनी नदीची पाणीपातळी वाढल्यामुळंही नदीपात्राजवळ असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं रुद्रप्रयाग येथे पुढील 24 तासांसाठीसुद्धा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.