इस्लामाबाद|Islamabad - पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने अजब दावा केला आहे. कुलभूषण यांनी आपल्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार कारावासाची शिक्षा भोगणार्या कुलभूषण जाधव यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. याऐवजी त्यांनी दया याचिकेची मागणी केली आहे. पाकिस्तानचे डिशनल टर्नी जनरल अहमद इरफान यांच्या म्हणण्यानुसार, कुलभूषण यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत असे करण्यास स्पष्ट नकार दिला.
दरम्यान पाकिस्तानची कायदेशीर यंत्रणा ही सैन्य शासित आणि सरकार शासित आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही कायदेशीर चौकटीचे किंवा आंतरराष्ट्रीय मापदंडांचे कोणतेही मूल्य नाही. त्यामुळे जाधव प्रकरणातील सर्व दरवाजे उघडे आहेत. पाकिस्तानचा कोणताही निर्णय किंवा आदेश हा आयसीजेच्या (आंतरराष्ट्रीय न्यायालय) निदर्शनात आणला जाईल.
कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारताने अनेकदा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. सन 2017 मध्ये भारताने आयसीजेकडे हे प्रकरण सोपावले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले.