
मुंबई | Mumbai
इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भारताला महाशक्ती बनायचे असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचे असेल तर तरुणांना आठवडाभरात किमान ७० तास काम ( Youth Should Work 70 hours a Week ) करायला हवे, असे नारायण मूर्ती म्हणाले. टीव्ही मोहनदास पै यांच्या पॉडकास्ट 'द रेकॉर्ड'मध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
नारायण मूर्ती म्हणाले की, 'कामाच्या उत्पादकतेच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. जोपर्यंत आपण आपली कामाची उत्पादकता वाढवत नाही, सरकारमधील भ्रष्टाचार कमी करत नाही, नोकरशाहीतील निर्णयांना होणारा विलंब कमी करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या देशांशी स्पर्धा करू शकत नाही.
नारायण मूर्ती म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे उद्ध्वस्त झाले होते. मात्र त्यांच्या देशातील नागरिकांनी विशेषत: तरुणाईने तासन् तास काम केले आणि जगाला दाखवून दिले. तसेच भारतातील तरुणाई जी देशाचे मालक आहेत, ते सुद्धा त्याच ताकदीने अर्थव्यवस्थेसाठी काम करतात.
नारायण मूर्ती म्हणाले की, 'प्रत्येक सरकार तितकेच चांगले असते जेवढी लोकांची संस्कृती असते. खूप कष्टाळू लोकांसाठी आपल्याला आपली संस्कृती बदलावी लागेल आणि हा बदल तरुणांकडूनच होईल. भारताच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरुणच आपला देश घडवू शकतात.
सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
नारायण मूर्ती यांच्या ७० तास काम करण्याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर युजर्समध्ये वाद सुरू झाला आहे. एका युजरने कमेंट केली, 'आठवड्यातील ७० तास काम करण्याबद्दल पूर्णपणे असहमत! ७० तास काम केल्यानंतर आम्ही सर्वोत्तम देश होऊ, पण कोणत्या किंमतीवर?
आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, 'फ्रेशर्सना इन्फोसिसकडून ३.५ लाख रुपये पगार दिला जातो, त्यांना आठवड्यातून ७० तास काम करावे लागते. भांडवलदार कर्मचाऱ्यांना नफा कमावणारी यंत्रे म्हणून पाहतात. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्थिती त्यांना महत्त्वाची वाटत नाही.
नारायण मूर्तींच्या '७० तास' च्या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानच्या चक दे इंडिया सिनेमातील '७० मिनिट'सोबत तुलना केली जात आहे. त्या सिनेमात भारताच्या महिला हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या, त्यावेळी शाहरुखने ७० मिनिटे तुमच्याकडे आहेत, जी तुमची आहेत, ती तुमच्याकडून कोणीही हिरावू शकत नाही, जगाला दाखवून द्या असा सल्ला दिला होता.