दिल्ली | Delhi
आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. १६ जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली. आता करोनाची तिसरी लाट आली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात बुस्टर डोसचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून शनिवारपर्यंत लसीचे १५६ कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात ९४ कोटी प्रौढ आणि १५ ते १८ वयोगटातील ७.४० कोटी किशोरवयीन आहेत. ही लोकसंख्या सध्या लसीकरण योग्य एकूण लोकसंख्या १०१.४० कोटी आहे.
यापैकी ६४.३१ टक्के म्हणजेच ६५.२१ कोटी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचवेळी ८९.१६ टक्के म्हणजेच ९०.४१ कोटी नागरिकांनी एक डोस घेतलेला आहे. अशाप्रकारे १०.९९ कोटी नागरिकांनी म्हणजेच जवळपास ११ कोटी नागरिकांनी लसीचा अद्याप एकही डोस घेतलेला नाही. २५.१९ कोटी नागरिकांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे.
हिमाचल प्रदेशात सर्व प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. चंदीगड आणि मध्य प्रदेशही लवकरच हे लक्ष्य गाठतील. पण, हे लक्ष्य गाठण्यात पंजाब आणि राजस्थान अजूनही खूप मागे आहेत.
दरम्यान भारतातील लसीकरण मोहीम ही जगातील सर्वात यशस्वी मोहीम ठरल्याचा दावा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.