नवी दिल्ली | New Delhi -
एक चतुर्थांश भारतीयांच्या शरीरात करोनाविरुद्ध लढणार्या अँटीबॉडी तयार झाल्या असल्याचे देशातील महानगरपालिका आणि काही प्रमुख संशोधन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे लवकरच संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र, अँटीबॉडीमुळे किती काळ विषाणूपासून बचाव होतो, याबद्दल अद्याप तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. Covid antibodies
दरम्यान, देशातील करोना बाधितांचा आकडा 27 लाखांच्या पुढे गेला आहे. सर्वेक्षणानूसार, पुण्यातील काही भागांमधील 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील 57 टक्के झोपडपट्टीवासीयांच्या शरीरात सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतील सर्वेक्षणात हेच प्रमाण 23 टक्के इतके आढळून आले. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्यांच्या शरीरात अँटीबॉडी आढळून येतात.
याबाबत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, काही भागांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सीरो-पॉझिटिव्हिटी असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, देशात आतापर्यंत दोन लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील जवळपास 24 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा सामना करू शकणार्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. दिल्लीत 29 टक्के, महाराष्ट्रात 27 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.