<p><strong>नवी दिल्ली -</strong></p><p>जीपीएस तंत्रज्ञानावर काम सुरु असून दोन वर्षानंतर या तंत्रज्ञानाद्वारे टोल घेतला जाईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल</p>.<p> असे केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गुरुवारी अॅसोचॅम परिषदेत ते बोलत होते.</p><p>ते म्हणाले, पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल. यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही, जीपीएस तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार नाहीत. वाहनांसाठी टोलची रक्कम आपोआप कपात केली जाईल. यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून लवकरच तो लागू केला जाईल.</p><p>जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोलिंगचा वापर करण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय काम करत आहे आणि आता भविष्यातील सर्व वाहनेही जीपीएस प्रणालीशी जोडली जातील. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरून टोल वसुली गेल्या वर्षीच्या 24,000 कोटी रुपयांच्या कर संकलनाच्या तुलनेत 34 हजार कोटी रुपये होती. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रालयामार्फत चालवल्या जाणार्या इतर प्रकल्पांची माहितीही दिली.</p><p>दिल्ली-मुंबई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेच्या 1300 किलोमीटर लांबीचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन वर्षांत हे कामही पूर्ण होईल. बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यानचा एक्सप्रेस वे दोन वर्षात पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे देखील लवकरच पूर्ण होईल, जेणेकरुन या शहरांमधील अंतर 4.45 तासात पूर्ण होईल. दिल्ली-अमृतसर-कटरा आणि अमृतसर-अजमेर यांना जोडणार्या प्रकल्पांचे कामही पुढच्या महिन्यात सुरू होईल असेही ते म्हणाले.</p>