गांधीनगर | Gandhinagar
गुजरातच्या मोरबी (Morbi) जिल्ह्यात एक झुलता पूल (Morbi Bridge Collapse) रविवारी कोसळला. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. पाच दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता.
यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच अधिक चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. हा पूल १४३ वर्ष जुना होता. जाणून घ्या पुलाचा इतिहास...
मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे बांधकाम 1880 मध्ये पूर्ण झाले. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी ते बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचे सर्व साहित्य ब्रिटनमधून आले होते.
बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटनेपूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाची लांबी 765 फूट होती. तर हा पूल 1.25 मीटर रुंद आणि 230 मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी 15 रुपयांचे शुल्क आकारले जात होते.
गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल दुरूस्तीमुळे सर्वसामान्यांसोबतच पर्यटकांसाठी बंद होता. 25 ऑक्टोबरपासून तो पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आला. या 6 महिन्यांत पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले.
या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपकडे आहे. ओरेवा ग्रुपनं मोरबी नगरपालिकेसोबत मार्च 2022 ते मार्च 2037 असा 15 वर्षांसाठी करार केला आहे. या कराराच्या आधारे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि टोल वसुली या सर्व जबाबदाऱ्या ओरेवा ग्रुपकडे आहेत.
मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेल्या या झुलता पुलाचा इतिहास सुमारे 14३ वर्षांचा आहे. या पुलाबद्दल बोलायचे झाले तर ते गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात.
या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा झुलता पूल आहे. ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मणाच्या झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येने लोक यायचे. रविवारी या पुलावर 500-700 लोक एकत्र जमल्याने पुलाला भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत कोसळला.