नवी दिल्ली -
विवाहासाठी मुलींचे वय किमान किती असावे याबाबतचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे, असे पंतप्रधान मोदी
यांनी म्हटले आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
नरेंद्र मोदींनी सांगितलं, मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातील मुलींनी मला अद्यापही संबंधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबद्दल विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वस्त करतो की अहवाल आल्यानंतर लगेचच सरकार त्यावर काम सुरु करेल. लग्न आणि आई होण्याचं वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून 22 सप्टेंबरल टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींनी यावेली महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहोचवण्याचं काम सुरु आहे. 1 रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केलं जात आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.