<p>दिल्ली l Delhi </p><p>गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच नवीन वर्षात येणाऱ्या लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. नाताळच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर वायदे बाजारातील सोने आणि चांदीच्या भावात बदल झाल्याने दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत.</p>.<p>सध्या सोन्याचा दर मुंबईत प्रतितोळा 49 हजारांच्या घरात आहे. तर दिल्लीत हीच किंमत 53 हजार इतकी आहे. याआधी हीच किंमत प्रतितोळा 400 रुपयांनी वाढून 50,500 रुपयांपर्यंत गेली होती. त्यानंतर ही किंमत 85 रुपयांनी खाली येऊन 50064 रुपयांवर थांबली होती. मात्र, आता वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2021मध्ये लग्नसराईच्या निमित्ताने सोन्याचे दर आणखी वाढतील अशी चिन्हं आहेत.</p><p>आज चांदीच्या किमतीतही जोरदार वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीच्या किमतीत 1980 रुपयांची तेजी आहे. ही उलाढाल 69, 500 रुपयांच्या आसपास होत आहे. याआधीच्या चांदीच्या भावात थोडीशी घसरण झाली आणि चांदीचा दर 67,509 रुपये प्रतिकिलोवर येऊन थांबला होता. त्याआधी हाच दर 67 हजारांच्या खाली येऊन 66,682 पर्यंतही घसरला होता.</p>.<p><strong>2021 मध्ये सोन्याचे दर 63000 रुपये प्रती तोळा होणार? </strong></p><p>येत्या नवीन वर्षात पॅकेज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोरोनावरील लस मार्केटमध्ये येण्यास देखील उशीर लागत असल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची असणारी कमजोरी हे देखील सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यामागील कारण आहे.</p><p>दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या 'वन नेशन वन गोल्ड' ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'वन नेशन वन गोल्ड' या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.</p><p>संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.</p><p>देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे 'वन नेशन वन गोल्ड' ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.</p>