
नवी दिल्ली -
कृषी सुधारणा करु नये म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर बाहेरील शक्तींचा
दबाव होता, असे खळबळजनक विधान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.
तोमर म्हणाले, अनेक आयोग, मंत्री, अनेक मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारांनी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न केले. युपीएच्या कार्यकाळात तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री शरद पवार यांनाही ही कृषी क्षेत्रातील या सुधारणा लागू करायच्या होत्या. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांशी पुन्हा सरकार चर्चा सुरु करणार असल्याच्या एक दिवस आधीच कृषी मंत्री तोमर यांनी हे विधान केलं आहे. विविध शेतकरी संघटनांच्या एका संयुक्त समितीने देखील तोमर यांची भेट घेऊन त्यांच्या कृषी कायद्यांना आपला पाठींबा असल्याचे सांगितले.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकच मिशन आहे ते म्हणजे विकास. जनतेचं भलं व्हावं हेच त्यांचं एकमेव मिशन आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव मोदींवर काम करु शकत नाही. या शक्ती याध्ये अपयशी ठरल्याने त्या आता विफल झाल्या आहेत, असंही तोमर यावेळी म्हणाले.