<p><strong>नवी दिल्ली - </strong></p><p>नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 100 दिवसांपासून शेतकर्यांचे आंदोलन </p>.<p>सुरु आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्यांना करोनाची लस देण्यात यावी अशी मागणी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या टिकरी सीमारेषेवर शेतकरी आंदोलन करत असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.</p><p>आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींदरम्यान चर्चेच्या अनेक फेर्या गेल्या 4 महिन्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र, अद्याप या समस्येवर तोडगा निघालेला नाही. हमीभाव आणि इतर मुद्द्यांवर शेतकर्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलक बॅकफूटवर गेल्याचं म्हटलं जात होतं. आंदोलकांचे काही गट फुटून परत देखील गेले. मात्र, तरी देखील मोठ्या संख्येने आंदोलक अजूनही दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.</p><p>दरम्यान, मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलक एकाच ठिकाणी आहेत. या आंदोलन स्थळांवर करोनासंदर्भातले नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.</p><p>राकेश टिकैत काय म्हणाले?</p><p>करोना पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जे लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत, त्यांना देखील व्हॅक्सीन दिली गेली पाहिजे. मी स्वत: देखील व्हॅक्सीन घेणार आहे. आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत, असे राकेश टिकैत म्हणाले.</p>