सलमानच्या हत्येचा कट : शार्प शूटरला अटक

काळवीट शिकार प्रकरणात सुटका झाल्यापासून बिश्नोई गँगच्या रडारवर
अभिनेता सलमान खान
अभिनेता सलमान खान

मुंबई / नवी दिल्ली | Mumbai / New Delhi -

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. शार्प शूटर असलेला आरोपी 27 वर्षीय राहुल संगा उर्फ बाबा याला हरियाणाच्या फरीदाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

तो उत्तराखंडच्या हिस्सारचा रहिवासी आहे. सलमानच्या हत्येसाठी त्याने मुंबईत रेकी केली आहे. राहुल लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. काळवीट शिकार प्रकरणात सुटका झाल्यापासून सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. Lawrence Bishnoi gang

सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे. सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिल्याचं कबूल केलं आहे.

राहुल हा कुविख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत. ऑगस्ट 2019मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या इशार्‍यावरून त्याने डिसेंबर 2019मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती. तसेच 20 जून 2020मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती. त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही 24 जून 2020मध्ये एकाची हत्या केली होती. फरीदाबाद पोलिसांनी त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार आहेत.

राहुलने मुंबईत वांद्रे येथे जानेवारीत सलमानची रेकी केली होती. त्यासाठी तो दोन दिवस मुंबईत थांबला होता. यावेळी सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवून असायचा. पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी त्याला उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथून अटक केली. त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची निमका तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी राजेश दुग्गल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. राहुलने जानेवारी 2020मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराच्या इशार्‍यावरून सलमानच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर त्याने राजस्थानच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला रेकीची माहिती दिली होती, असं दुग्गल यांनी सांगितलं. रेकी केल्यानंतर राहुल पुन्हा राजस्थानात आला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला. दरम्यान, राहुलला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com