दिल्ली | Delhi
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्यापैकी नियंत्रणात आली आहे. तसेच भारतात दोन महिन्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची सर्वात कमी संख्या आज नोंदवली गेली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार ४८० नवे करोना रुग्ण आढळले असून १ हजार ५८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ८८ हजार ९७७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ वर पोहचली आहे.
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३२ लाख ५९ हजार ००३ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात गुरुवारी ८ हजार ८३० करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तसेच नवीन ८ हजार ८९० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५६ लाख ८५ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १ लाख ३९ हजार ९३० सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं ९५.६४ टक्के झालं आहे.