दिल्ली | Delhi
करोनाच्या (Covid-19) नव्या ओमियक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. भारतातही ओमियक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. करोनाच्या ओमियक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतामध्ये १७ राज्य, केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण ओमियक्रॉनबाधितांची रूग्णसंख्या आता ४१५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण म्हणजे १०८ आहेत. तर त्यापाठोपाठ दिल्लीत ७९ रूग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ११५ जणांनी मात केली आहे. भारतात ओमियक्रॉन मुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.
केंद्राचा मोठा निर्णय
दरम्यान, वाढत्या ओमियक्रॉन बाधितांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सारकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने महत्वाच्या १० राज्यांमध्ये नियमांचं पालन होत आहे की नाही, याच्या निरीक्षणासाठी टीम्स पाठवण्यात आल्या आहेत. ही पथकं ओमियक्रॉनच्या संदर्भातील परिस्थितीबाबत केंद्राकडे डेटा पाठवतील. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
यापैकी काही पथकं ओमियक्रॉन प्रकरणांची वाढती संख्या नोंदवत आहेत. तसेच लसीकरणाच्या गतीसंदर्भात डेटा पुरवणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये बहु-अनुशासनात्मक पथक तैनात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने केली आहे.
देशातील करोना स्थिती?
देशात मागील २४ तासांमध्ये ७ हजार १८९ करोनाबाधित आढळले आहेत. तसेच ३८७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ हजार २८६ बाधितांनी करोनाला मात दिली आहे. करोनावर आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख २३ हजार २६३ बाधितांनी मात दिली आहे. सध्या देशात ७७ हजार ०३२ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.