दिल्ली | Delhi
देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. हा विषाणून पूर्वीच्या करोना विषाणूपेक्षा धोकादायक असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान गेल्या २४ तासात करोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल १ लाख ३ हजार ५५८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी २५ लाख ८९ हजार ०६७ इतकी झाली आहे.
तसेच गेल्या २४ तासात ५२ हजार ८४७ जण उपचारानंतर बरे झाले असून ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
देशात सक्रिय रुग्नांची संख्या ७ लाख ४१ हजार ८३० इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ६५ हजार १०१ इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत ७ कोटी ९१ लाख ०५ हजार १६३ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
१६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात करोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे.
या १२ राज्यात सर्वाधिक रुग्ण
भारतातील १२ राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.