दिल्ली | Delhi
देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय ५ हजारांनी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार १५४ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ७२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०८ लाख ७४ हजार ३७६ इतकी झाली आहे.
तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०८ हजार ७६४ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३९ हजार ६४९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ३ कोटी १४ हजार ७१३ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०३ हजार २८१ रुग्णांवर उपचार आहेत.
भारताचा सध्याचा रिकव्हरी रेट ९७.२२ टक्के इतका झाला आहे. तसेच भारताचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३२ टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट २.५९ टक्के इतका आहे. मागील २१ दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.
दरम्यान, देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १२ लाख ३५ हजार २८७ लसीचे डोस रविवारी एका दिवसात देण्यात आले.
महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)
महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ८ हजार ५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१ लाख ५७ हजार ७९९ झाली आहे.राज्यात आज रोजी एकूण १ लाख १६ हजार १६५ सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी राज्यात ६ हजार १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५९ लाख १२ हजार ४७९ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.