सार्वमत
नवी दिल्ली- राजस्थानमधील भिलवाडा येथे करोना विषाणूच्या साथीच्यावेळी एका लग्नाला आलेल्या अनेक लोकांनी आपल्या मृत्यूला आमंत्रण दिले आहे. आतापर्यंत या लग्नात सामील झालेल्या 16 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर 58 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि तीन दिवसांत सहा लाख रुपयांहून अधिक दंड भरण्यासही सांगितले आहे.
घिसूलाल राठीचा मुलगा रिझुलचे लग्न 13 जून रोजी शहरातील भदादा परिसरात झाले होते. लग्नासाठी कुटुंबाने प्रशासनाची मंजुरी घेतली तेव्हा त्यांना जास्तीत जास्त 50 लोक लग्नात उपस्थित राहू शकतील या अटीवर परवानगी देण्यात आली, परंतु लग्नात त्यापेक्षा जास्त लोकांना बोलावण्यात आले. सर्वात मोठी समस्या तेव्हापासून सुरू झाली जेव्हा नवरदेवासह 16 लोकांना करोना विषाणूची लागण झाली. यापैकी एकाचा मृत्यू देखील झाला आहे.
या लग्नात सामील झालेल्यांपैकी अजून जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार या लग्नात सामील झालेल्या 15 संक्रमितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि 58 लोकांना आयसोलेट करण्यात आले आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आयसोलेशन वॉर्ड, आयसोलेशन सेंटर सुविधा, अन्न, तपासणी, वाहतूक व रुग्णवाहिका इत्यादी मदतीमुळे सुमारे 6,26,600 रुपयांचा महसूल तोटा झाला आहे. तहसीलदारांना तीन दिवसांत ही रक्कम गोळा करून मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यास सांगितले आहे.