दिल्ली | Delhi
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. परंतु काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाली आहे.
मात्र महिनाभरापासून देशात करोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६३ हजार ५३३ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार ३२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ७८ हजार ७१९ वर पोहोचली आहे.
तसेच देशात गेल्या २४ तासात ४ लाख २२ हजार ४३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ वर पोहचली आहे.
ICMR दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १८ कोटी ४४ लाख ५३ हजार१४९ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. यामध्ये १५ लाख १० हजार जणांचं लसीकरण सोमवारी झालं.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रातील करोना आकडेवारीचा आलेख काही दिवसांपासून घसरता आहे. राज्यात काल २६ हजार ६१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ४८ हजार २११ रुग्णांनी करोनावर मात केली. तसेच ५१६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.