लडाख -
लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना विश्वासघातकी चीनने आता अरुणाचलमध्ये तब्बल साडे चार किलोमीटर आत
भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. धक्कादायक म्हणजे या भागात चीनने नवीन गाव वसवले असून 101 घरेही बांधली आहेत.
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनार्याजवळ चीनने हे नवीन गाव वसवले आहे. याचे सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत. या भागावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असून मागे सशस्त्र संघर्षही झाला होता. परंतु आता चीनने येथे एक अख्खे गावच वसवल्याचे समोर आल्यानंतर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, याबाबत भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही ट्वीट केले आहे. चीनच्या या कृतीवर सवाल उपस्थित करत या प्रकरणी आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ऑगस्ट 2019 ला येथे गावाचे कोणतेही निशाण नव्हते. मात्र नोव्हेंबर 2020 ला घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये येथे गाव वसवण्यात आल्याचे स्पष्ट दिसले. गलवान खोर्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनने हे गाव वसवल्याचे बोलले जात आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.