नवी दिल्ली -
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी
केला आहे तसेच गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण हा शब्दही हटविण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज गुरुवारी दिली.
ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगताना त्यांनी, भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीचे जगभरात कौतुक केले जात असल्याचे ट्विटरवर सांगितले.
अभ्यासकमातील कोणते धडे वगळण्यात आले आहेत, यासंदर्भात मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले. परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. मुखाच्छादनाचा वापर करा आणि भौतिक दूरता पाळा. सर्व नियमांचे पालन करा. नीट परीक्षा यासंदर्भातील सर्वांत मोठे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. शाळा सुरू करण्याचा निर्णय आम्ही राज्यांवर सोपविला आहे. अलिकडील काळात 17 राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.