
बंगळूर l Bangalore
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खरंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे. यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते.
दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर, आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घुमजाव केले आहे. शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही आपल्या देशाचे आदर्श असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही स्वातंत्र्य सैनिक आणि आपले आदर्श आहेत. मी दोन्ही महापुरुषांचा आदर करतो अन् त्यांचे अनुकरण करतो. मात्र, काही समाजकंटकांडून भाषेच्या आधारावरुन समाजात तेढ निर्माण करण्याचं आणि तणावाचं वातावरण करण्यात येत आहे. तसेच, या घटनेसंबंधित कर्नाटकात आत्तापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आल्याचंही बोम्मई यांनी सांगितलं.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावं."