नवी दिल्ली -
भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षांसह 1300 पेक्षा जास्त महत्त्वाच्या व्यक्तींची चीनने हेरगिरी केल्याचे उघडकीस आल्यानंतरही शेपूट वाकडेच असलेला
विश्वासघातकी चीन भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवून होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चीनच्या युआन वाँग ही टेहाळणी नौका मलाक्काच्या सामुद्रधुनीत आली होती. याच भागातून ती भारतीय युद्धनौकांची टेहाळणी करीत होती. या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्धनौकांच्या हालचालींवर चीनचे लक्ष होते. भारतीय नौदलाच्या लक्षात ही बाब येताच, चीनच्या नौकेने काढता पाय घेतला. चीनच्या या हेगगिरी नौकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. अगदी दुरूनही याद्वारे टेहळणी करणे शक्य असते.
इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या युद्धनौका मलाक्काच्या सामुद्रधुनी परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे, चीनची हेरगिरी गंभीर मानली जात आहे. भारतीय नौदलाच्या ही घटना लक्षात आल्यानंतर, त्यांनी तातडीने हालचाली करीत सूचक इशारा दिला आणि त्यानंतर चीनच्या नौकेने पळ काढला.