
नवी दिल्ली | New Delhi
काल बुधवार (दि.०४) रोजी सिक्कीममध्ये (Sikkim) अचानक ढगफुटी (Cloud Burst) होऊन तेथील तीस्ता नदीला पूर (Flood) आल्याची घटना घडली होती. या ढगफुटीमुळे भारतीय लष्कराच्या (Indian Army Personnal) २३ जवानांसह काही लोक बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता तीस्ता नदीला आलेल्या भीषण पुरात आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून यात ८ जवानांचा समावेश आहे. तर १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत...
याबाबत अधिक माहिती अशी की, तीस्ता नदीवर (Teesta River) चुंगथांग याठिकाणी धरण उभारण्यात येत असून धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु होते. यासाठी १२ ते १४ कामगार काम करत होते. हे सर्वजण तेथील एका बोगद्यात अडकून पडले आहेत. त्याचबरोबर मांगण जिल्ह्यातील (Mangan District) चुंगथांग, डिग्चू, गंगटोक जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रांगपो याठिकाणी २६ लोक जखमी झाले असून बारडांग येथे २३ जवान अद्यापही बेपत्ता आहेत.
यासंदर्भात सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही. बी. पाठक यांनी माहिती देताना सांगितले की, लोनाक तलावावर मंगळवारी रात्री १०.४२ वाजेच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यानंतर या तलावातील पाण्याला मोठ्या प्रमाणावर उधाण आले, यानंतर हे पाणी थेट तीस्ता नदीच्या पात्रात शिरले. यामुळे तीस्ता नदीच्या पाण्याने पात्र सोडून वाहू लागली, त्यामुळे एकूणच भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. तर या पुराच्या पाण्यामुळे हायवे देखील वाहून गेला आहे.
दरम्यान, याठिकाणी राज्य सरकारने आणखी तीन एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. तसेच सध्या एनडीआरएफची एक टीम रांगपो आणि सिंगतम शहरात तैनात आहेत. तर एनडीआरएफच्या टीमने राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे तीन हजार पर्यटक अनेक मार्ग बंद झाल्याने अडकून पडल्याचे सांगितले आहे.