मल्लपुरम | Malappuram
केरळातील मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर गावात रविवारी सायंकाळी पर्यटकांची बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतारपर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर बोटीच्या मालकाविरुद्ध सदोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी दिलेल्या माहितीनूसार, अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे ४० लोक होते. मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.
अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि NDRF घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन व्हायरल होतं आहेत.
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.