
बालोदाबाजार | Baloda Bazar
भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने प्रवाशी खचाखच भरलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना छत्तीगडच्या बालोदाबाजार जिल्ह्यातील भाटापाडा परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बलोदाबाजारच्या खिलोरा येथील साहू कुटुंबातील सदस्य पिकअपमधून अर्जुनी येथे गेले होते. रात्री उशिरा ते परतत होते. त्यानंतर खमारिया येथील डीपीडब्ल्यूएस शाळेजवळ त्यांच्या पिकअपला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा चक्काचूर झाला.
या अपघातात ४ बालकांसह ११ जणांचा मृत्यू झाला. १५ जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त जवळच्या इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन गंभीर जखमींना रायपूरला हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या भयंकर घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.