मुंबई | Mumbai
हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे.
राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, औरंगाबाद, नाशिकसह आणखी काही शहरांचा पारा ८ सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने (Weather Department) पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी (Maharashtra Cold Wave) पडणार आहे.
येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून (IMD) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.
पुढील ३-४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील. तर आज, रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एकाकी ठिकाणी दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होईल.