
मुंबई | प्रतिनिधी
राज्यभरातून शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारींद्वारे पीकविमा कंपन्यांना मदतीसाठी हक्काच्या पिकविम्यासाठी आर्जव केले आहे. तरीही विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतकेंद्रे उभारावीटत आणि शेतकऱ्यांना पीकविमा मिळतो की नाही याची माहिती घेऊन तो मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
राज्यात यंदा काही ठिकाणी अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्यापेक्षा खाली आली आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना आणली. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा तयार पीकाचे अतिवृष्टी अथवा इतर कारणामुळे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रार करू शकतो. त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई देईल, असे आश्वासन दिले होते.
मात्र विमा कंपन्या याबाबत टाळाटाळ करत असल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्याला विमा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अग्रीम २५ टक्के मदत देणे बंधनकारक आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या मदत केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होता येते. राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यातील ८९० महसुली परिमंडळात पावसाचा खंड जवळपास २५ दिवस पडला होता. त्यात आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्या वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत, याकडे शिवसैनिकांनी लक्ष घालून त्या पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.