
अमरावती | Amravati
राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे (Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident) झाला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला आहे...
ट्रक समृद्धी महामार्गावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तारेने भरलेला ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात होता. सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान ट्रकचा भीषण अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून 15 फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून वाहक गंभीर जखमी झाला आहे.
आशिष तिवारी असे मयत चालकाचे नाव आहे, तर संतोष केवट असे वाहकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
हा महामार्ग सध्या नागपूर ते शिर्डी पर्यंत सुरू झालेला असून लवकरच दुसरा ४४ किमीचा टप्पा सिन्नरपर्यंत सुरू होणार असल्याचे समजते. पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या सिन्नरपासून इगतपुरीपर्यंत घाट सेक्शन असल्याने काम सुरू आहे.