
मुंबई | Mumbai
पुणे आणि मुंबईला जोडणारा एक्सप्रेसवे हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाने हजारो प्रवाशी रोज प्रवास करत असतात. मुंबई पुणेकरांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. मात्र, आता या मार्गावरील प्रवास महागणार आहे.
१ एप्रिल २०२३ पासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल १८% ने वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवासाचा खर्च वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, MSRDC दर वर्षी ईवेवरील टोलमध्ये ६% वाढ करते, परंतु ते दर तीन वर्षांनी एकदा एकत्रितपणे लागू केले जाते. दरम्यान हा हिशोब पाहता टोल वाढवला जाणार असल्याची माहिती आहे. १ एप्रिलपासून १८ % ने ही वाढ असणार आहे.
नव्या दरांनुसार कारचा टोल २७० रुपयांवरून ३१६ रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा ७९५ वरुन ९४० रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी इथं सध्या ५८० रुपये द्यावे लागत होते. यापुढे ६८५ रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी ४२० रुपयांऐवजी ४९५ रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.
पुणे, मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरतो.