
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) भोपाळमधून (Bhopal) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हिरे यांच्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे (Dada Bhuse) कट्टर विरोधक मानले जातात. तसेच शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
दरम्यान, बँकेची ही सुमारे आठ वर्ष जुनी केस असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असून सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असल्याने न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व हिरे यांनी यापूर्वी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३१ कोटी ४० लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज उचलल्याचा आरोप आहे.