
मुंबई | Mumbai
राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची परिस्थिती (Drought Conditions) उद्भवू नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दुष्काळ नियंत्रण वॅार रुम (War Room) बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या वॅार रुमच्या माध्यमातून दुष्काळाच्या उंबरठयावर असेलली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यावर नजर ठेवली जाणार आहे. तसेच दुष्काळाच्या उंबरठयावर असलेल्या गाव, तालुके, जिल्हे, विभाग यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर या वॅार रुमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान, यंदा राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने राज्यातील काही भागांत दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) मंत्रालयात दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष अधिकारी नेमून आढावा घेतला जाणार असून त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. नुकतेच राज्य सरकारने धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरिता आरक्षित केला जाणार आहे.
२०१५ साली वॅाररुमची स्थापना
राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या वॅाररुमची स्थापना केली होती. या वॅार रुमच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची कामे यासारख्या ५० हुन अधिक प्रोजेक्टचा आढावा याच वॅार रुममधून मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. यानंतर आता सत्तांतर झाल्यावर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आले आहे.