<p><strong>मुंबई -</strong></p><p> राज्यसरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा मराठा तरुणांबरोबर आम्हालाही </p>.<p>उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.</p><p>आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.</p><p>मराठा समाजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे असेही दरेकर म्हणाले.</p>