<p><strong>मुंबई - </strong> </p><p>इंग्लंडमध्ये करोनाचा नवा धोकायदायक प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान</p>.<p>इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश जिल्हा आणि महानगरपालिकांना दिले आहेत.</p><p>करोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य अधिकार्यांकडून राज्य सरकारला देण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेला पाठवली असून, संबंधित जिल्हा आणि महापालिकांनी या प्रवाशांचा शोध घेऊन तातडीने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुण्यातील एन.आय.व्ही येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची पाहणी करण्यात येईल. तपासणीमध्ये जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील 28 दिवस करण्यात येईल. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून 5 व्या ते 10व्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.</p><p>25 नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरुन भारतात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या किंवा महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.</p>