<p><strong>धुळे - Dhule - प्रतिनिधी :</strong></p><p>जिल्ह्यातून गुजरात राज्यात जातांना प्रवाशाजवळ कोरोना विषाणूची चाचणी केल्याचा आणि ती निगेटीव्ह आल्याचा अहवाल 72 तासाचा असणे आवश्यक असल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. </p>.<p>त्यामुळे प्रवाशीच प्रवास करत नसल्याने धुळे विभागातून धावणार्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बसेस बंद केल्यामुळे सुमारे प्रत्येक दिवशी दीड लाखांचा महसूल बुडत आहे.</p><p>गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.</p><p>जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणार्या प्रवाशांजवळ कोरोना विषाणूची चाचणी केल्याचा आणि ती निगेटीव्ह आल्याचा तीन दिवसापुर्वीचा (72 तास) अहवाल प्रवाशांजवळ असणे आवश्यक करण्यात आले आहे.</p>.<p>त्यामुळे प्रवाशांकडून हा अहवाल नवापूरपासून सहा किमी अंतरावर तपासला जातो. अहवाल नसेल तर प्रवाशांनी तेथून परत पाठवले जाते.</p><p>ही प्रक्रिया धुळ्यातून गुजरात राज्यात जातांना व गुजरात राज्यातून धुळ्यात येतांना दोन्ही वेळा केली जाते. या प्रक्रियेमुळे प्रवाशांनी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका परिवहन महामंडळाला बसला आहे.</p><p>प्रवाशीच नसल्यामुळे धुळे विभागातून 40 बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बसेस धावत नसल्याने परिवहन महामंडळाचे एका दिवसाला दीड लाखांचे नुकसान झाले आहे.</p>.<p>प्रशासनाने प्रवाशांना अहवाल बाळगणे सक्तीचे केले आहे. यामुळे प्रवाशांनी गावाला जाणेच टाळले आहे. म्हणून या मार्गावर परिवहन महामंडळाच्या बसेस धावतच नाहीत. केवळ साक्री, नवापूरपर्यंतच बसेस धावत आहेत.</p><p>परंतू गुजरातची सीमा नवापूरपासून सहा किमी अंतरावर सुरु होते. तेथे प्रवाशांची तपासणी केली जाते. कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल असेल तरच पुढे प्रवासाला परवानगी दिली जाते. अन्यथा परत पाठविले जाते.</p>