मुंबई | Delhi
१०० कोटींच्या खंडणी प्रकरणी (Rs 100 crores extortion matter) सध्या आर्थर रोड जेल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी अद्याप संपायचं नाव घेत नाहीयेत. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये (judicial custody) वाढ केली असून त्यामुळे अनिल देशमुख लवकर तुरुंगातून बाहेर येण्याच्या आशा मावळल्या आहेत. आता १० जानेवारीपर्यंत अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीमधला मुक्काम वाढला आहे.
निलंबित एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगाला चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता. पण तरीही मधल्या काळात देशमुख आणि वाझे यांच्या एकाच खोलीतील तासभर भेटीच्या चर्चांना उधाण आलं होतं. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण अनिल देशमुखांना आता १० जानेवारीपर्यंत तरी जेलमध्येच राहवं लागणार असल्याचं सध्याचं चित्र आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटकं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप केला. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.