लागा तयारीला ! पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी भरती

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
लागा तयारीला ! पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी भरती

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज पोलीस भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्यात १२ हजार ५३८ जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार

पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती केली जाईल. त्यानंतर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात पोलीस खात्यात नोकरीची संधी उमेदवारांना मिळणार आहे. असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती होणार आहे तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून एसीबीसीच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com