मुंबई | Mumbai
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे.
दरम्यान राज्यात सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्याचे (exam scam)पडसाद अपेक्षेप्रमाणे विधानसभेत उमटले. संपुर्ण शासकीय यंत्रणा सडलेली असून या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याच्या बाहेर झाली नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. न्यासा कंपनीला अपात्र केल होत मात्र त्यानंतर त्यांना पात्र करण्यात आल्याचे सांगताना सभागृहात गुरुवारी चर्चेची मागणी फडणवीस यांनी केली.
यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. तसेच आरोग्य भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. गट ड ची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यायची का? पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पध्दतीने परीक्षा घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेता घेतली जाईल असे देखील राजेश टोपेंनी सांगितले आहे. यासोबतच कोणत्याही चुकीच्या पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नसल्याचे देखील टोपे म्हणाले आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.