<p><strong>पुणे (प्रतिनिधि) - </strong></p><p>पुण्यातील वानवडी परिसरात सात फेब्रुवारीला पूजा चव्हाण या अवघ्या बावीस वर्षाच्या तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची </p>.<p>घटना घडल्याचे समोर आले होते. मात्र, या घटनेला त्यानंतर वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्यांचे नाव समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागले. </p><p>यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांना पत्र पाठवून या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी आज अखेर आतापर्यंतच्या संपूर्ण तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सुपूर्द केला.</p><p>पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलीस कामाला लागले आहेत. पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गेले आहे.</p><p>दरम्यान भाजपच्या नेत्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाले नाही. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.</p>