मुंबई -
राज्यात हनिमून सरकार आहे का? अशी टीका माजी राज्यमंत्री तथा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी महाविकास आघाडी सरकारवर
केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक वार सुरू आहेत. या वादात आता आमदार येरावार यांनी उडी घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या बाराही क्लिपमध्ये संजय राठोड यांचा आवाज आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. राठोड, अरुण आणि पूजाचा मोबाईल पोलिसांनी जप्त करायला पाहिजे. संजय राठोड यांनी स्वतः समोर येऊन खुलासा करण्याचा सल्ला येरावार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा फोन, लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी का प्रयत्न करत होते, त्यात असे काय लपलेले आहे याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावे, अशी मागणी भाजप नेते मदन येरावार यांनी केली. एखादया मंत्र्यांवर असे आरोप लागत असेल तर त्या मंत्र्यांनी पुढे आले पाहिजे. आठ दिवस होऊनसुद्धा एवढ्या ऑडिओ क्लिप असताना चौकशी होत नाही त्यामुळे हे सरकार महिलांप्रती किती सजग आहे हे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या पाहिजे. 12 ऑडिओ क्लिपमधील संभाषणात राठोड यांचा आवाज असल्याचे स्पष्ट समजते. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. आम्ही या संदर्भात आंदोलन करू असा इशाराही येरावार यांनी दिला आहे.