नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa
राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून कामगार कल्याण मंडळा मार्फत नोंदणी कृत बांधकाम कामगारांना बांधकाम हत्यारे, औजारे खरेदीसाठी देण्यात येणारे 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य योजना बंद केल्याने राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1996 मधील कलम 22 मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याची तरतुद आहे. त्यास अनुलक्षून संदर्भाधीन क्र. 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगांरास नोंदणीनंतर लगेच हत्यारे - अवजारे खरेदीकरीता 5000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आलेली होती.
परंतु महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दि.13 फेब्रुवारी 20202 रोजीच्या 53 व्या बैठकीत सदर अर्थसहाय्य योजना बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास शासन मान्यता देण्यात आली आहे.त्यानुसार राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दि.14 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून हे अर्थसहाय्य बंद केल्याचे कळविल्याने राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरीता महामंडळ स्थापन झाले आहे. परंतु योजना मात्र जणु मंडळावर नियंत्रण असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी आहेत असे वाटु लागते.मुळ योजनेत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करतातच त्यांना ताबडतोब औजारे खरेदीकरता 5 हजार रुपये आणि ही औजारे खराब झल्यावर दर 3 वर्षांनी पुन्हा 5 हजार रुपये अर्थ सहाय्य देणे अपेक्षित होते. परंतु बरेच कामगार पात्र असताना त्यांना अद्याप एकदाही अर्थसहाय्य न देता योजना तडकाफडकी बंद केली हे दुर्दैवी आहे. बांधकाम कामगारांच्या सरकारच्या प्रति अनास्थेचं हे एक मुर्तीमंत उदाहरण आहे. आम्ही याचा ठाम विरोध करतो आहोत.
डॉ.करणसिंह घुले (अध्यक्ष, समर्पण फाउंडेशन, नेवासा)