मुंबई -
परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता कांद्याचाही भाव वाढत आहे. मुंबई शहरात कांद्याच्या किरकोळ दराने
70 -90 रुपयांवर झेप घेतली आहे तर पुणे परिसरात तो 50 ते 70 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागेल. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये काल 705 टन कांद्याची आवक झाली असून घाऊक बाजारातच कांद्याचा प्रतिकिलो दर 40 ते 70 रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एपीएमसी बाजारात इराणवरून कांद्याची आयात करण्यात आली आहे. काल सोमवारी मुंबई बंदरात 600 टन इराणी कांदा दाखल झाला आहे. यातील 25 टन कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येईल. त्यामुळे कांद्याचे दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.