मुंबई -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) भरतीमधील निवड झालेल्या आणि 2017 मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण 737 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. या उमेदवारांचे प्रशिक्षण जून महिन्यापासून सुरु होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
एसआरपीएफ जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द
राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.