मुंबई -
केंद्र सरकार असंवेदनशील असून कोविड काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कपात केला. आम्ही कोविड काळ असल्याने मान्यही
केले मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अंबरनाथ येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
मन की बात मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब मन की बातमधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टिका करतानाच काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्या शेतकर्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते असेही त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
ईडीची नोटीसीनंतर राज्यात गेमचेंज
शरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला त्या जनतेचे खासदार सुळे यांनी विशेष आभार यावेळी मानले शिवाय सातार्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले याची आठवण खासदार सुळे यांनी करुन दिली. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिला त्याचा मानसन्मान नक्कीच केला जाईल. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन जो एकटा लढत होता त्या कार्यकर्त्याचाही मानसन्मान 100 टक्के करणार असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.