मुंबई | Mumbai
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजही राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनचा प्रवास पुढे सरकला आहे.
आता प्रतिक्षा आहे ती हाच मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होतो याची. मात्र, त्यासोबतच मान्सूनपूर्व पावसाची महाराष्ट्रात हजेरी लागते का? याबाबतही उत्सुकता आहे. राजधानी दिल्ली येथे मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाकडे नागरिक डोळे लावून बसले आहरेत.
दरम्यान, राज्यातील तापमान अद्यापही चढेच आहे. हवेतील आर्द्रताही कमालीची कमी झाल्याने उन्हाच्या झळा वाढल्या असून चटकाही जाणवत आहे. त्यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून केव्हा दिलासा मिळेल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. दरम्यान, नाही म्हणायला काही ठिकाणी मात्र हवामान ढगाळ असल्याने थोडा वेळ का होईना उन्हापासून सूटका होते आहे.
काल वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून होती. तर जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रता कमी असली तरी उकाडा मात्र अधिक जाणवत होता. पुढील दोन दिवसांत वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. वायव्येकडूनही वारे वाहतील. पण हे वारे उत्तर आणि वायव्य दिशेकडून वाहत असल्याने अस्वस्थता कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे.
या आठवड्यात मराठवाड्यावरून जाणारा पश्चिमी प्रकोप आणि ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मागील दोन दिवसांत राज्यात काही भागांमध्ये पाऊस पडला. तर राज्यातील काही ठिकाणी गाराही पडल्या. येत्या ५ जून रोजी अरबी समुद्रात एक प्रणाली तयार होत असून त्यामुळे मान्सूनपूर्व सरी अनुभवता येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशांच्या आसपास पोहचला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे.
पण त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुणे वेधशाळेने इशारा पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत घसरू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
तसेच मान्सूनच्या दृष्टीने अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार होत आहे. मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून पोहोचला आहे. यंदा अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधी (१९ मे) मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानात दाखल झाला.