
मुंबई | Mumbai
छोट्या गाड्यांकडून टोल घेतल्यास टोलनाका (Toll Plaza) जाळून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी (Raj Tackeray) दिला आणि त्यानंतर आता मनसैनिक (MNS) आक्रमक झालेत. टोलनाक्यावर मनसैनिक टोल न देताच गाड्या सोडून देत आहेत. पनवेलच्या शेडुंग आणि मुलुंड टोलनाक्यावर आक्रमक मनसैनिकांनी गाड्या फुकट सोडल्यायत. दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी हलक्या वाहनांना टोल माफी देण्यात आल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडीओ वाहनचालकांना दाखवत मनसे कार्यकर्त्यांकडून याठिकाणी जनजागृती केली जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी अविनाश जाधव यांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली. “मला सांगा, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खोटे बोलले का? त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला? मी गाडी अडवून आंदोलन करत नाहीय. मी जनजागृती करत आहे. मला जनजागृती करण्याचा अधिकार आहे. मी आज अरेस्ट होणार नाही. तुम्ही मला उचलून न्या”, असे अविनाश जाधव पोलिसांना म्हणाले.
अविनाश जाधव आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिक आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा टोल वसुलीचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरेंनी टोलबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारितील टोल बंद केले असल्याचं सांगत छगन भुजबळांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
तर राज्य सरकारच्या रस्त्यांवरचा टोल बंद झाला असून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केलीय असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेय. तर टोल म्हणजे भाजपकडून सुरू असलेली मोठी लूट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.
फडणवीस यांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिलाय. आता फडणवीसांच्या कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण जारी केलेय. 2015 रोजी 12 टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीच्या ५३ टोलनाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल आकरला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
२०१५ साली काही टोलनाके बंद केले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट दिली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो.
काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध नेत्यांचे व्हिडीओ दाखवून त्यांच्या टोल विषयीच्या भूमिका सांगितल्या. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही टोलमुक्त महाराष्ट्राची, अशी विधाने केली. मात्र टोल हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. टोल घेत आहात, मग रस्ते चांगले का नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
टोलचा विषय, रस्त्यातील खड्ड्यांचा विषय हा काश्मिरइतका किचकट विषय आहे का? हा विषय इतकी वर्ष का सुटत नाही? रस्त्यातील खड्डे भरण्याची अवाढव्य रकमेची टेंडर्स कशी निघू शकतात? खड्डे भरण्याची टेंडर्स आपल्याकडेच निघतात. बाकी कुठेच घडत नाही. आणि हा विषय जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.