
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन (Agitation) करत असलेल्या एका तरुणाने (Youth) मुंबईतील (Mumbai) वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावर आता मराठा आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) प्रतिक्रिया देत सरकारला अल्टिमेटम दिला आहे....
यावेळी माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, "सरकारने मराठा आंदोलकांचे (Maratha Protestors) बळी घ्यायचं का ठरवलंय कळत नाही. सरकारमुळेच आमचे बळी पडायला लागलेत, मराठा समाजाला मी हातपाय जोडून आवाहन करतो की आपल्याला आरक्षण मिळणार आहे, आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही. आपण खूप वर्षे दम धरला आहे, थोडे दिवस आणखी दम धरा. जर मुलंच कमी व्हायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? हे सर्व पाप सरकारचे आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत. सरकारने आता तरी त्या भावांचे बलिदान वाया जाऊ देऊ नये. तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारने घ्यावा. २४ तारखेनंतर होणारे शांततेचे आंदोलन (Agitation) सरकारला परवडणार नाही", असे जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "या आत्महत्येला फक्त सरकार (Government) जबाबदार आहे. आमच्या हक्काचा असणारा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणारच नाही. मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये. बलिदान वाया जाऊ देणार नाही. २४ तारखेनंतर होणारे शांततेचे आंदोलन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. असं काही ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. या वेदना थोडे दिवस सहन करा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका. आमच्या परिवारातील आमचा भाऊ गेला आहे. आमचा माणूस गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण द्या. २४ तारीख उजाडू देऊ नका. आम्ही मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाही", असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा गेल्या काही दिवसांपासून तीव्र होत असून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आणि महाराष्ट्र दौऱ्यामुळे (Maharashtra Tour) मराठा आंदोलक आणखी पेटले आहेत. त्यातच, आज एकाने आत्महत्या केल्याने हे मराठा आंदोलक अधिक तीव्रतेने सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.