
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यामुळे राज्य मंडळाचा निकाल कधी जाहीर होईल, याबाबत विचारणा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने निकालाबाबत सूतोवाच दिले आहेत.
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत, तर बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली. साधारण १४ लाखांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी बारावीची, तर १६ लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या दोन्ही परीक्षा होऊन साधारण दीड महिन्याचा कालावधी उलटला असल्याने विद्यार्थी-पालक लक्ष दहावी-बारावीच्या निकालाकडे लागले आहे.
राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काही दिवस शैक्षणिक कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे साधारण आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामे होऊ शकले नाही. संपाचा दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर फारसा फरक पडला नाही. मात्र, त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीला वेग आला. त्यामुळे निकाल तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यत दोन्ही निकाल जाहीर झालेले असतील.