मुंबई -
महाराष्ट्रात आज दिवसभरात 21 हजार 29 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे
19 हजार 476 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. यासोबत राज्यभरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 56 हजार 30 वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 73 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 61 लाख 6 हजार 787 नमुन्यांपैकी 12 लाख 63 हजार 799 नमुने पॉझिटिव्ह (20.69 टक्के) आले आहेत. राज्यात 18 लाख 75 हजार 424 लोक होम क्वारंटाईन आहेत, तर 34 हजार 457 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 479 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.68 टक्के एवढा आहे.